रविवार, ३१ जानेवारी, २०१०

आईची ओढ

मी मुळचा सोलापूर शहरातील देगाव या गावचा.  देगाव गाव सोलापूर शहरापासून साधारण ४-५ किलोमीटर आहे. माझे आई आणि वडील दोघेही नोकरीला असल्याने त्या दोघांनाही रोज नोकरीसाठी सोलापूर शहरामध्ये यावे लागे. मग लहानपणी ते दोघेही मला आणि माझ्या २ बहिणींना देगाव वरून सोलापूर शहरामध्ये आईच्या माहेरी आणून सोडत आणि मग नोकरीला जात. आई ज्या बँकेमध्ये काम करायची ती बँक आईच्या माहेरापासून २००-२५० मीटर होती. आईवडिलांच्या नोकरीमुळे आम्हा भावंडांचे हगणंमुतणं आईच्या माहेरीच व्हायचे.

पहिली घटना आहे मी एक दिढ वर्षांचा असतानाची म्हणजे जेंव्हा मी नुकतेच चालायला शिकलो असेल तेंव्हाची (साल १९८४).
आईच्या कामकाजाची वेळ सकाळी १०:०० ते संध्याकाळी ०५:३० पर्यंतची असायची. दुपारी ०२:३० - ०३:०० वाजता त्यांची जेवायची सुट्टी व्हायची आणि आई त्यावेळेत आम्हाला भेटायला आणि आमचा हालहवाला पाहायला माहेरच्या घरी यायची. अर्धा तास आमच्याबरोबर घालवून परत बँकेत जायची.

पण एक दिवस आमच्या मासाहेब जेवणाच्या सुट्टीमध्ये आम्हाला भेटून परत बँकेत कामाला निघाल्या असताना आम्ही अमरराजे मासाहेबांच्या मागे कुणाच्याही नकळत (मासाहेबांच्यासुद्धा) नंगे निघालो होतो. आम्ही मासाहेबांना म्हणत होतो कि मासाहेब आपण आम्हास सोडून जाऊ नकात पण आमचा आवाज मासाहेबंपर्यंत पोहचतच नव्हता. मग आम्हांस रडत रडत मासाहेबांच्या मागोमाग बँकेमध्ये जावे लागले. मासाहेबांनी बँकेचे काम सुरु केल्यानंतर काही वेळातच अमरराजे बँकेत हजर झाले. आम्हांस पाहून बँकेतील एक कर्मचारी म्हणाले कि, कोण बाळराजे इथे बँकेत आले आहेत. आणि हे ऐकताच मासाहेबांनी आम्हांस आपल्या कवेत घेतले आणि मासाहेब म्हणाल्या, राजे आम्ही काही वेळाने घरी येणारच होतो. मासाहेबांनी आम्हांस घरी सोडले, आमची समजूत काढली, आणि त्या परत बँकेत गेल्या.


दुसरी घटना आहे मी ४-५/५-६ वर्षांचा असतानाची मुंबईला घडलेली. १९८८/१९८९ ला आम्ही सगळेजण (आई, वडील, २ बहिणी, आणि मी) आमच्या मुंबईच्या आत्याकडे गेलो होतो. माझी आत्या मुंबईमध्ये जोगेश्वरीला राष्ट्रीय महामार्गानजीकच्या एका टेकडीवर असलेल्या सोसायटी/चाळ मध्ये राहत होती. आत्याचे यजमान जरा जास्तीच रागीट आणि कडक होते. एक दिवस सकाळी माझी आई, मोठी बहिण, आणि आत्याची मुलगी रक्तदानासाठी म्हणून बाहेर गेले होते. दुपार झाली तरी ते काही घरी परतले नव्हते. मला आणि माझ्या लहान बहिणीला आईची खूप आठवण येत असल्यामुळे आम्ही आत्याला सारखे विचारत होतो कि आई कुठे गेली आहे म्हणून. पण आम्हाला "येईलच थोड्या वेळात" असे उत्तर मिळत होते. दुपार झाली तरी आई परत न आल्याने मी आणि माझ्या लहान बहिणीने ठरवले कि आता आपणच टेकडीच्या खाली जाऊन आईला शोधायचे. मग आम्ही आत्याला आणि आत्याच्या यजमानांना नकळत घरातून बाहेर पडलो आणि टेकडी उतरायला लागलो. थोडीफार टेकडी उतरलोदेखील पण समोरील महामार्गावरील वाहतूक पाहून निम्म्यातच थांबलो आई कुठे दिसते का ते पाहत. त्यावेळी आमच्या मनात आणखी एक राग असा होता कि आई गेली ते गेली आणि बरोबर मोठ्या बहिणीला का घेवून गेली तेही आम्हा दोघांना सोडून. मोठ्या बहिणीला बरोबर घेऊन गेल्यामुळे जरा जास्तच चिडचिड होत होती. बराच वेळ झाला आम्ही घरामध्ये दिसेनात म्हणून आत्याचे यजमान आम्हाला शोधत शोधत बाहेर आले. त्यांनी आम्हाला टेकडीवर पाहिल्यानंतर पकडून घरी परत नेले आणि आम्हाला चांगलाच मार देऊन आमचा खरपूस समाचार घेतला. मग काय आमचे रुसवे फुगवे. थोड्या वेळाने आई परत आल्यावर मग उस्फूर्त रडारडी.

तिसरी घटना मुंबईनंतरची म्हणजे आम्हाला थोडीफार समाज आल्यानंतरची. एकदा आई आजारी असल्यामुळे ती विश्रांतीसाठी आणि उपचारांसाठी माहेरी होती आणि आम्ही देगावला. बहुतेक याही वेळेस मोठी बहिण आईबरोबर होती किंवा आमच्याबरोबर देगावी नव्हती (आता नीटसे आठवत नाहीये). आम्हाला आईची खूप आठवण येत होती पण आम्हाला देगाववरून सोलापूर शहरामध्ये आणून सोडायला कुणी नव्हते. बसने कसे जायचे ते माहिती होते कि नाही हे आठवत नाहीये. पण जर बसने कसे जायचे माहित असले तर बसने जाण्यासाठी जवळ पैसे नव्हते. मग काय, मी आणि लहान बहिण आईला भेटण्यासाठी पुन्हा बाहेर निघालो तेही कुणाला न सांगता. आईचे माहेर ४-५ किलोमीटर होते. भर उन्हामध्ये आम्ही आईला भेटायला निघालो होतो. आम्ही निम्म्या वाटेपर्यंत पोहचलेले मला आठवतेय पण पुढे काय झाले ते आठवत नाहीये ...

- अमर गायकवाड

४ टिप्पण्या: